शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

जगणं !

इकडे तिकडे बघताना जाणवतं की वाहत राहणे हा पाण्याचा गुणधर्म, जेथे पाणी थांबले तेथे डबके तयार होतं व चांगले साफ पाणी देखील खराब होतं. असाच काहीसा गुणधर्म जिवनाचा पण आहे, जिंदादिलीने जगणे म्हणजे जिवन, प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस. जे आहे त्यात संतुष्ट राहणे चांगले आहे पण त्याच बरोबर काही तरी नवीन करण्याची जिद्द / ललक मनामध्ये असणे म्हणजे जिंदादीली, स्वप्न असावीत प्रत्येकाची, मनामध्ये एक धेय असावे, एक मुक्काम आपल्यासाठी ठरवलेला असावा तरच जगण्यात काही तरी मजा आहे, उगाच जगायचे म्हणून काय जगायचे ? गाढवासारखे ओझे वाहत जगायचे की काम करत आपली स्वप्ने पाहत, त्या स्वप्नांना पुर्ण करण्याचा ध्यास घेत उल्हासाने जगायचे हे आपल्याच हाती, जगता ना अनेक अडचणी येतात, दुखः येतात तर कधी कधी मानसिक त्रास होतो पण ह्यासर्वांना जो टाळून, त्यावर मार्ग काढून चालत राहतो तोच खरं जगणे जगत असतो.

दुखः कोणाला नाही आहे, सर्वांना काही ना काही दुखः आहेच ना, त्यांना उगाळत बसण्यापेक्षा जिवनाच्या उद्देशाकडे अर्थपुर्ण नजरेने पाहणं व त्याच दृष्टी ने वाटचाल करणे व आपल्या बरोबर आपल्या परिवाराला, मित्रांना व समाजाला घेऊन चालणे म्हणजेच जिवन. राग लोभ व मत्सर ह्या तर मानव जिवनाचा अविभाज्य अंग पण तरी ही असले गुण थोडा वेळ बाजूला काढले तर आपले जिवन किती सुखी आहे ह्या वर तुम्हाला आपोआप विश्वास बसेल. सिध्दांत व तत्वे ह्यांची योग्य सांगड घातली व थोडा नियमांचा हातभार आपल्या दैनंदिन जिवनाला दिला तर तुम्ही खरोखर एक उच्च पातळी गाठू शकता. प्रत्येकाचा एक प्रेरणा स्त्रोत असतो तो तुमचा दिपस्तंभ तुम्हाला जिवनात नेहमी मार्गदर्शन करत राहतो मग तो तुमचे आई-वडील, पत्नी, लेखक, एखादे पुस्तक, एखादा व्यवसायीक, फिल्मस्टार, एखादा चित्रपट, एकादे गीत, संगीत काही ही असू शकेल, जिवनाच्या यात्रे मध्ये अश्या ठरावीक अंतरानंतर भेटणारे दिपस्तंभच आपल्याला आपल्या मार्गावर व्यवस्थीत विचरण करता यावे ह्यासाठी आपल्या बरोबर असतात, जरुरी नाही आहे की ती प्रेरणा सरळ सरळ मार्गदर्शनातून मिळेल असे नाही पण त्याच्या कार्यातून, कलाकृतीतून आपल्याला प्रेरणा मिळत असते, आपण आपले मार्ग स्वतःच ठरवतो पण त्या उद्दिष्ठाजवळ जाण्यासाठी आपण काही आधार घेतो ते आधार म्हणजेच आपले प्रेरणा स्त्रोत, त्यांचा हात हातात पकडला तर जिवन कसे सोपे सोपे वाटू लागेल.

आपलं लक्ष्य ठरवणं व त्याच्या प्राप्तीसाठी वाटचाल करणे ह्या दोन्ही गोष्टी साठी प्रेरणा तर असावीच लागते त्या बरोबर एक असाधारण असा गुरु देखील असावा लागतो ती गुरु म्हणजे कोणी शिक्षक अथवा मास्तर नाही, जिवनामध्ये कधी ना कधी एखाद्या वळणावर भेटलेला व्यक्ती, तुमचे आई-वडील अथवा पत्नी, कधी कधी लहान मुळे देखील गुरुचे काम करतात, जर तुम्ही सध्या टिव्ही वर एक जाहिरात येते ती पाहिली आहे का ? एक लहान मुलगा व त्यांचे वडील गाडी मध्ये बसलेले असतात, गाडी सिग्लनवर उभी आहे, व मुलगा आपण पुढे जिवनामध्ये काय करणार हे सांगत असतो व तो अचानक म्हणतो की बाबा एक आयडिया आहे मी मोठा झाल्यावर सायकल रिपेयरीचे दुकानच घालणार.. त्याचे वडील त्याच्या कडे एकदम चमकुन बघतात तर तो निरागस पणे म्हणतो की तुम्ही मोठी लोकं असेच जर विनाकारण पेट्रोल नष्ट करत राहिलात तर आम्ही मोठे झाल्यावर आमच्या साठि पेट्रोल कुठून येणार मग सगळे सायकलीच नाही का चालवणार.. ! किती उत्तम मार्गदर्शन ! पेट्रोल बचाव ची जाहिरात होती पण ती जाहिरात मला काही तरी शिकवून गेली माझ्या साठी तो लहान मुलगा गुरुच भले ही त्याचे डॉयलॉग कोणी दुस-याने लिहले असतील पण माझ्या पर्यंत ती भावना पोहचण्याचे कारण म्हणजे तो मुलगा त्यामुळे तोच माझा गुरु.

येवढ्या मोठ्या जगात काही ना काही उलाढाली चालूच असतात कधी चांगल्या तर कधी वाईट, त्याचा आपल्या जिवनावर प्रभाव पडतच असतो, परिस्थीती रोज बदलत असते, आजकाल मंदिचा बोलबाला आहे व तुम्ही आम्ही सर्वजण ह्यात जळत आहोत पण ह्यामुळे आपले मानसिक, घरगुती व सामाजिक स्वास्थ का आपण बिघडवायचे ? कोणी आत्महत्या करतो आहे कोणी आपल्या बरोबर आपल्या परिवाराचा देखील बळी घेत आहे, ह्याला कारण काय ? आपण बदल त्या परिस्थीतीला सामोरे जाण्यास कमी पडत आहोत का ? ह्या तून देखील मार्ग निघेल हा आशावाद का दिसत नाही आहे, सर्वत्र आशावाद ठेऊन चालत नाही हे मला ही माहीत आहे, कधी कधी समोरचा रस्ता बंद असतो तेव्हा आपण पर्यांयी मार्ग शोधतोच ना ? मग अश्या वेळी जेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की आता काहीच मार्ग नाही म्हणजे तुम्ही हरला आहात असे नाही , तुम्ही खुल्ल्या मनाने नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्नच नाही केला असे आहे. जहा चाह वहां राह.. ही एक हिंदी मध्ये खुप चांगली कहावत आहे , ह्यावर विश्वास ठेवा, देवाची निर्मितीच ह्यासाठी झाली आहे की जेथे जेथे आपला विश्वास डगमगतो तेथे तेथे त्याचा सहारा घेता यावा व आपल्याला थोडा वेळ मिळावा की ह्या अडचणीतून कसा मार्ग काढावा पण जेथे संस्कार व जिद्द कमी पडते तेथे मग आत्मघात सारखे भयानक मार्ग अवलंबले जातात, ह्यातून ही मी बाहेर पडेन हा विश्वासच जेथे संपतो तेथे आत्महत्या होते भले ही तो माणूस मरु दे अथवा नाही ज्याचा स्वतः वरील विश्वास संपला तो संपला.


तुम्हाला काय वाटतं ?

तुम्ही आपल्या जिवनाचे उद्दिष्ठ व गुरु कसे ठरवता व तुम्हाला वेळोवेळी असे मार्गदर्शक भेटलेच असतील त्यांच्या बद्दल थोडं लिहा ही अपेक्षा, जेणे करुन जो खचला आहे त्याला थोडाफार मदतीचा हात मिळेल.

हे लिहण्यासाठी मला प्रेरणा ह्या बातमीतून मिळाली होती.

धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: