मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

माझी सफर..... भेट -भाग -१७

मी जेथे होतो तेथेच पोहचलो होतो.... नोकरी करत होतो त्यामुळे परत जाणे गरजेचे होते काय करावे काय नाही ह्या विवंचनेतून मी परत दिल्लीला जाणे व काही काळाने परत येणे हा निर्णय घेतला.

काहीच कळत नव्हते काय करावे ? कोल्हापुरातून परत जाणे हे गरजेचे होते कारण नोकरी ! पैसा हवा होता येथे परत येण्यासाठी.
मनाला कसेबसे समजावले व परत दिल्लीला जाणे नक्की केले.
असाच फिरत फिरत मी महाद्वार रोडवरुन पापाच्या टिकटी कडे चालतच निघालो होतो, समोरुन एक चेहरा ओळखीचा वाटत होता, पण कोठे पाहीले होते अथवा ह्यांचे नाव काय असावे हा गोंधळ चालू होता व ती व्यक्ती माझ्यासमोरुन निघून गेली.. तोच त्यांचे नाव आठवले, पाटिल काकू... आमचे पुर्वीचे शेजारी ! मी लगेच मागे वळलो व त्यांच्या जवळ गेलो.
मी - " नमस्कार, तुम्ही पाटील काकू ना ? ज्या बुधवार पेठे मध्ये राहत होता...रॉकेल डेपो जवळ ? "
त्या - " हो. पण मी तुम्हाला ओळखले नाही "
मी - "काकू मी राजा.. जैन... सुशिला जैन ह्यांचा मुलगा, आम्ही तुमच्या शेजारी राहत होतो आठवले ?"
त्या - " राजा तू ! कीती बदलला आहेस रे, व मोठा ही झाला आहे ! कोठे असतोस रे.... आई कशी आहे... बाबा अजून ही दारु पीतात ?"
माझ्या डोळ्यातून एकदमच पाणी आले व मला डोळ्यासमोर अंधाकार झाल्या प्रमाणे वाटले मला वाटले होते ह्या भल्या मोठ्या कोल्हापुरात मी खुपच वर्षाने परत आलो आहे कोणाला ओळखेन न ओळखेन पण नशीबाने ह्या भेटल्या ... पण नशीब फुटकेच होते ह्यापण त्याच विवंचनेत होत्या ज्या विवंचनेत मी होतो... मी त्यांना जवळच कामत मध्ये घेऊन गेलो व सविस्तर सगळे सांगितले.. काकूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले व म्हणाली " लेका... हे काय झाले रे.. एका भरलेल्या घराची अशी कशी वाताहात लागली.. काळजी करु नकोस देव बघतो आहे... आज ना उद्या तुला तुझे आई वडील भेटतीलच."

मी त्यांचा निरोप घेऊन परत हॉटेलवर आलो व सर्वात प्रथम जाण्याचे टीकीट रद्द केले व निर्णय घेतला की परत नसलापूरला जाणे व तेथून काही मार्ग दिसतो का ते पाहणे !

सकाळ सकाळी मी नसलापुरला पोहचलो व गावाच्या पारावर बसलेल्या वृध्द लोकांच्या समुहाकडे गेलो व आपली ओळख सांगितली, त्यातील काही नी मला लहान पणी पाहीलेले होते तर काहीं ना माझे नाव तुरळक आठवत होते... मी त्यांच्या कडे खुप आस लावून आलो होतो... व देवा ने माझी प्रार्थना स्वीकार केली एकाने मला माझ्या मोठ्या मावशीच्या घराचा पत्ता दिला.
मी थोडा आनंदलो व मार्ग दिसला म्हणून परत देवाचे आभार मानले... सरळ बस पकडुन कुडची येथे गेलो व तेथे जाऊन मावशीच्या घरचा पत्ता शोधला, घराच्या जवळ येता येता मला दरदरुन घाम फुटू लागला व ह्रदयाची गती वाढू लागली ... मी घरासमोर जाउन उभा राहीलो व दरवाजा वाजवला...

एक लहानशी ७ एक वर्षाची मुलगीने दरवाजा उघडला... व मला विचारु लागली " आपण कोण ?"
मी म्हणालो" मावशीला.... सारीका मावशीला बोलवशील का ?"
ती हो म्हणालो व आत निघून गेली , थोड्या एक वेळाने सारीका मावशी आतून बाहेर आल्या.. मी त्यांना १४ एक वर्षानंतर पाहत होतो.. शक्यतो मी ८ एक वर्षाचा होतो तेव्हा पाहीले होते ....
मावशी - " कोण पाहीजे ?" माझी सगी मावशी मला विचार होती व मी जरा हसलो व म्हणालो " मावशी मी राजा... तुमच्या लहान बहीणीचा मुलगा ... कोल्हापुरवाला"
त्या एकदमच दचकल्या व म्हणाल्या " राजा तू ? यल्ल दी नो मगना ( कुठे होतास रे लेकाच्या - कन्नडमध्ये) आत ये "
त्या पाणी घेऊन आल्या व घरातील सर्व मंडळी माझ्या भोवती बसलेली मोठी माणसे""मी आज भूत पाहीले "ह्या नजरे ने मला निहाळत होते.. दोन एक तास माझी कर्म कहाणी एकल्यावर तात्यांनी (मावशीचा नवरा) माझ्या पाठीवर थोपाटले व म्हणाले " राजा, एका चुकीचे प्रचंड मोठे परिणाम तु व तुझ्या घरातल्यांनी भोगले... देवाची करणी.. पण तु गेल्या नंतर आम्ही सर्वांनी प्रचंड शोधा शोध केली.. तु कोठे काही भेटला नाहीस ना काही खबर... पाच एक वर्षानी तुझे वडील देखील अती दारु मुळे मरण पावले .... तुझ्या बहीणीचे लग्न आम्ही करुन दिले आहे एका चांगल्या घरात ! तुझी आई व माझी आई व गावातील अजून काही जणी चारधाम यात्रेसाठी गेल्या आहेत... मागच्याच आठवड्यात त्यांना परत येण्यासाठी दिड एक महीना हवा.."
माझ्या डोळ्यातून निरंतर आश्रु वाहू लागले व मी तेथून उठलो व म्हणलो जरा मला वर बालकनी वर जाणे आहे रस्ता दाखवता का ?
माहीत नाही कीती वेळ मी तसाच बाल्कनी मध्ये उभा होतो व डोळ्यातून पाणी वाहत होते...
मी घराचा कुलदिपक .. एकच मुलगा ! पण वडील वारले व मी त्याना अग्नी देण्यासाठी पण उपलब्ध नव्हतो... ह्याचीच मला लाज वाटू लागली ! मीच का नाही मेलो ... हा विचार डोक्यात सारखा सारखा येऊ लागला ! तोच मावशीने मला हलवले व म्हणाली.. " जे झाले ते झाले विसर सगळे व चल खाली .. थोडे फार खाऊन घे ! "
मी म्हणालो " नको.. मी जरा कोल्हापुरला जाऊन येतो, तेथील एका लॉजवर माझे कपडे आहेत ते घेऊन येतो ! "
त्यांनी मला जाऊच दिले नाही व म्हणाले " अजून एक दिवस थांब.. सकाळी तुझ्या बहीणीच्या घरी जाऊ "

मी रात्र कशी काढली हे माहीत नाही.. सकाळ सकाळी आम्ही तयार होऊन तात्याच्या बरोबर अक्काच्या ... बहीणीच्या घरी निघालो..

दोन एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका मळ्यातील घरासमोर थांबलो...
तात्यांनी आवाज दिला " कोणी आहे का घरात "
एक माझ्या वयाचा मुलगा बाहेर आला व तात्यांना पाहून नमस्कार केला व म्हणाला " अहो पाहूणे... आत या ! तुमचेच घर आहे असे विचारुन काय येताय" तात्यांनी मला परिचय करुन दिला व म्हणाले " राजा.. हे सागर. रुपाचा नवरा !" व सागरला सांगितले मी कोण आहे ते.
सागर " तुम्हीच का रुपाचे भाऊ.... अहो किती शोधायचे तुम्हाला... जेव्हा जेव्हा पुणा-मुंबईला गेलो... नजर तुम्हालाच शोधत असे... तुमचा एक लहान पणीचा फोटो आहे माझ्या कडे अजून ही..." असे म्हणून रुपाला आवाज दिला.

आतून एक एक स्त्री बाहेर आली व पाठोपाठ दोन लहान लहान मुले.

काय बोलावे काय.. विचारावे... काय उत्तर द्यावे.. काही शब्द भेटत नव्हते ना गळ्यातून आवाज येत होता!
तात्यांनी ओळख करुन दिली व त्या बिचारीचा आश्रुंचा बांध तुटावा अशी अवस्था झाली ! अर्धा एक तास ती रडल्या वर माझ्या जवळ आली व म्हणालदा..."दादा... बाबा गेले रे " असे म्हणून तीची शुध्दी हरपली.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: