शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

विरोधाभास..

खुप शहरं पाहिली मी ह्या डोळ्य़ांनी.. मंबई असो वा कलकत्ता अथवा दिल्ली नाही तर दुर उत्तरेकडे वसलेले नैनीताल नाही तर सुदुर पसरलेल्या दक्षिणेतील एखादं शहर. सगळ्यांची सुरवात एकाच विचाराने होते आजचे पोट कसे भरावे ? कोमजलेली सकाळ, घामाजलेली दुपार व थकलेली संध्याकाळ.. ह्याच्या पलिकडे काहीच नाही. राबराब राबण्यात एखाद्याचा जीव जरी गेला तरी मागे वळून पाहण्यासाठीही वेळ नाही कुणाकडे...राबण्याची जिद्द असते अतोनात पण एखाद्या मड्यावर रडण्यासाठी थोडा ही वेळ नाही..

उंच उंच इमारतीमध्ये, थंडगार हवे मध्ये बसून एखाद्या राज्यासंबधी, एखाद्या शहरासंबधी, एखाद्या खेड्यासंबधी निर्णय घेणे एकदम सोपे आहे, कोण जगावे व कोण मरावे ह्याचा निर्णय देखील आजकाल माणसं घेतात हे पाहून देखील नवल वाटते. कधी काळी ३५ रु. ला मिळणारा मॆकडीचा बर्गर आता २० रु. ला मिळतो, पिझा स्वत: झाला म्हणून कंपनीवाले टिव्हीवर, रेडिओवर, टॊयलेटच्या भिंतीवर बोंबलत आहेत. खरोखर सर्वकाही स्वस्त झाले आहे ? चार रु. किलो कांदा मिळायचा ह्यावर मुलांना विश्वासच नाही, तेल कधी तीस रु. किलो होते ह्या वाक्यावर तर मुले हसतात, खुप पुर्वीची गोष्ट नाही आताचीच काही वर्षापुर्वीचीच गोष्ट. भाव आकाशी भिडले हे वाक्य प्रचार आम्ही पुस्तकात वाचायचो.. आजकाल मुले ह्याची देही.. ह्याची डोळी पाहतात.. आकाश खुपच ठेगणे झाले आहे. हजारो टन भाजीपाला आपल्याला रस्त्यावर फेकावा लागत आहे भाव मिळत नाही म्हणून व दुसरीकडे जेवायला एकवेळचे अन्न नाही म्हणून भुकबळी पडत आहेत ह्या किती मोठा विरोधाभास आहे.

एखादी बातमी, एखादा चित्रपट, एखादी डाक्युमेंट्री येते हलकेच आपल्याला हळवी करुन जाते व आपण परत निर्लजासारखे आपल्या सरावलेल्या जगात परत जातो, एखादा आत्महत्या करतो, एखादा स्व परिवार आपली यात्रा संपवतो, आपण हळहळतो व परत आपल्या जगात सराईतासारखे वावरतो. काही जणांना लाखो रु नाही पुरत काही महिना काढण्यासाठी, काहीजणांच्या घरामध्ये दिवसोदिवस चुल पेटत नाही त्यांचा विसर पडतो. कुठेतरी निसर्ग बचाव आंदोलन चालू असते कुठे तरी वन्यजीव बचाव.. पण कुठेच सामान्य माणूस बचाव हे आदोलन चालू आहे असे नाही पाहीले कधी. पाळीव कुत्र्याविषयी, बैलाविषयी माणसाला आपुलकी आहे पण आपल्यात जात बाधवावर जरा ही दया नाही... अशी विचित्र जात मानवाची.

कुठेतरी देव असेल व तो पहात असेल हे सर्वकाही. आपण चुकत आहोत, कुठे ना कुठे हे नक्की. सगळेच काही नेते मंडळी नाकर्ते आहेत असे नाही, नाही तर आपल्या देशाचा देखील पाकिस्तान होण्यासाठी खुप वेळ लागला नसताच. पण कुठे तरी आपण एक समाज म्हणून नक्की चुकतो आहोत. आज ना उद्या कधी ना कधी आपल्याकडे असलेले इंधन हे संपणार आहे, पर्यायी इंधनाचा अजून काहीच शोध लागला नाही आहे, सुर्य उर्जा हा एक विकल्प दिसत आहे समोर पण कोणीच त्यावर योग्य पध्दतीने कार्य करत नाही आहे, प्रगत देशामध्ये काय होत आहे माहीत नाही पण भारतासारख्या असामान्य देशात जो प्रगतशील आहे त्यामध्ये खुप मोठे अडथळे दिसत आहेत. शेती व्यवसायामध्ये खुप मोठी तफावत आहे, निसर्ग नेहमी प्रमाणे साथ देत नाही आहे जेव्हा पाऊस पडावयास हवा तेव्हा दुष्काळ व जेव्हा पाऊस नको तेव्हा महापुर अशी अवस्था होत आहे देशात सर्वत्र. अनिश्चित पाऊस हे दृष्य भारतासारख्या पावसावर अवलंबून असलेल्या देशाला नक्कीच हानीकारक आहे. वीजेचे काय गुण गावावेत.. जेथे दिल्ली सारख्या राजधानी मध्ये पुर्ण २४ तास आपण विज देऊ शकत नाही तेथे सुदुर पसरलेल्या खेड्यांमध्ये आपण कशी वीज २४ तास देणार आहोत हेच मला अजून कळले नाही आहे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आपला देश खरोखर सज्ज आहे ? हे मागेच आलेल्या वादळावरुनच समजते. माहीतीची देवाण-घेवाण मध्ये एवढी तफावत आहे की अनेकांचे जीव गेले तरी त्या संबधीत खात्याला त्याची आकडेवारीच नाही माहीत.

एकवीसावें शतक चालू होऊन पण आता नऊ वर्ष पुर्ण होत आलीत पण अजून पण आपण जाती व्यवस्था, आरक्षण व सबशिडीवर अवलंबून आहोत, रस्त्यावर चालणारे शेकडॊ हजारो व्यक्ती आपल्याला कुठल्या जातीचा माणूस टच करुन गेला हे पाहण्य़ासाठी वेळ नसताना फक्त फक्त आपल्यामध्ये राजकीय कारणामुळेच जातीव्यवस्था टिकून आहे, राहुल गांधी दलिताच्या घरात एका रात्री जेवला ही आपल्याकडे ब्रेकिंग न्युज असते तर भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष फक्त जातीय राजकारणामुळेच पोसले जातात. सबसिडी व्यवस्था / आरक्षण व्यवस्था ही देश आझाद झाल्यानंतर काही वर्षात मागे घेण्याची मागणी बाबासाहेबांनी केली असे कुठे तरी वाचले होते, पण देश आझाद होऊन ६० वर्ष झाली आपल्या खांद्यावर अजून ही आरक्षण / सबसिडी व्यवस्था आहेच उभी. आपण कुठेतरी नक्की चुकत आहोत हे आपल्याला कळत आहे पण अभेद अशी राजकीय इच्छाशक्तीची कमतरता व योग्य असा नेता नसल्यामुळे कुठेच काही फरक पडत नाही आहे.

काय होणार आहे काही कळत नाही आहे. निराशवादी मी नाही आहे पण समोर जे दिसत आहे, घडत आहे ते पाहून खरोखर मनामध्ये चलबिचल होत आहे. बघू काय घडतं ते.. महासत्ता होण्याच्या नादात आपण कुठेतरी आपली जाणीव हरवून बसलो नाही म्हणजे झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: