मंगळवार, २७ जानेवारी, २००९

दिल्ली ते दिल्ली ! भाग - ३

आम्ही लगेच ( ?) निघालो व काही तासातच ठाण्याला पोहचलो.



मागील भाग 



ठाण्याला पोहचल्यावर मला पहिल्यांदा कळाले की वंदना हे नाव बस स्थानकाचं देखील असू शकते....  लवकरच  रिक्षा पकडुन आम्ही मार्गस्थ झालो.. लुईसवाडी.  भव्य अश्या अपार्टमेंट जवळ पोहचु पर्यंत प्रभु आम्हाला मोबो वर  मार्गदर्शन करतच होते... लिफ्ट द्वारे ४थ्या मजल्यावर पोहचलो, दरवाजा उघडा ठेऊन एक वयाने आजोबा सारखे व्यक्ती बसलेले दिसले व आम्हाला बघताच ताडकन उठून आले व आत या म्हणत... आत घेतले !  काही क्षणामध्ये ओळख-पाळख झाली निलकांतने माझी ओळख करुन दिली व क्षणार्धात प्रभुने कट्टा चालू केला.

प्रभु " सर्वसाक्षी, विजुभाऊ, टार्या व रामदास येतीलच आता." मी " ह्म्म."  प्रभु " तु मिपावर का दिसत नाहीस ?"  मी " हम्म नाही, असंच थोडंस मतभेद" प्रभु " का ?"  मी "२६/११ च्या वेळी तात्याशी भांडलो, लेखन अप्रसिध्द करण्याच्या मुद्द्यावर. मतभेद बाकी काही नाही"   त्यानंतर शब्दशः दहा मिनिटामध्ये किस पाडणे ह्या वाक्यप्रचाराचा पुर्ण अर्थ मला समजला ;)  माझे एक वाक्य प्रभुची दहा उत्तरे ! " तुझ्या बाबाचं काय जातं ? " इति प्रभु.  पंधरा मिनिटे निलकांत व मी एकत बसलो.."मी चुकलो... मला माफ करा... मी पुन्हा असं नाही करणार...." असे बोंबलावे असा आत्माचा आवाज मला येऊ लागला होता... तोच फोन वाजला व प्रभु फोनशी चिटकले.. त्यामुळे जरा माझा आत्मा वर मी दोघे पण चिंतन करु शकलो.  हात पाय धुन घेतले व मस्त पैकी एक ग्लास रिचवला पाण्याचा.... तेव्हा कुठे समाधान वाटले...  दरवाजाला लागूनच लिफ्ट होती... त्यातून चित्रविचित्र आवाज आले..  तोच प्रभु म्हणाले " आले.. साक्षी व रामदास आले.. त्यांचा फोन होता..."  तोच दोन महापुरुषांचे आगमन झाले, राम राम - नमस्कार , साक्षी साहेबांनी आपले नेहमीचे हत्यार  (कॅमेरा) काढून समोरील... टेबलावर ठेवले.. व बाजूला पडलेली प्रवासाची माझी बॅग पाहून प्रभुनां विचारले " कुठे प्रवासाला ? " प्रभुने माझ्या कडे उंगलीदर्शन करुन सांगितले " ही त्याची.. राज जैन"  मी " सर्वसाक्षी साहेब, मी तुमचा मनोगत पासूनचा चाहता... तुमचं लेखन आवडतं बरं मला खुप."  आपला नेहमीचा मस्का ट्राय !
हसून " अच्छा... तुमच्या प्रतिक्रिया असतात.. "  आपल्या मस्काची वाट लागलेली पाहून मी तीच गोळी परत रामदास बुवा कडे पण फिरवली.. ते पण आपले स्मित हास्य करुन गप्प... मी मोठ्या प्रमाणे विचार करुन तोंड बंद ठेवले व त्यांच्या गप्पा मध्ये रस घेऊ लागलो.... 
तोच कोणी तरी म्हणाले " तुम्हीच का राज जैन ? वाटत नाही तुमच्या कडे पाहून"  मी त्यां सर्वांची नजर चुकवून राहीलेली गेम पुर्ण करत होतो मोबो मध्ये... मी कावराबावरा होऊन इकडे तिकडे पाहीले... समोर रामदास-प्रभु-साक्षी-विजुभाऊ-निलकांत  कोणी प्रश्न विचारला ते काही कळाले नाही तरी पण हसून सगळ्याच्या कडे पाहीले व म्हणालो " हो मीच आहे.... पण हा प्रश्न का बरे ? " तोच प्रभुंचा फोन वाजला... मी वाचलो ... !   प्रभु म्हणाले "अरे लेका ल म्हणजे ... लंडनचा  ;) " एवढेच आम्ही एकले व मी व रामदास ह्याचा हास्य कार्यक्रम चालू झाला..." टारझनचा होता... फिरतो आहे आपल्या जेन बरोबर लेकाचा इलिफंटा वर... तीन वाजताच सांगितले होते की टायमात ये म्हणून आला तर ठीक... मी आता फोनच नाय करत."- प्रभु.


आत किचन मध्ये... काकु काही तरी तळत होत्या.. व त्याचा मंद असा सुवास बाहेर बैठकी मध्ये दरवळत होता... व पोटाले उंदिर जागे होऊन उड्या मारुन लागलेच होते तो पर्यंत पुन्हा लिफ्ट वाजली.... व तात्या आले... ! ती भरभक्कम काय मी प्रथमच पाहत होतो.... फोटो मध्ये खुपच बारिक दिसतात बॉ तात्या... ;)   माझ्या बलदंड व राक्षसी देहा समोर तात्यांचा देह म्हणजे काय ? मी उंदीर ते हत्ती !  त्यांना पण नमस्कार चमत्कार करुन झाले.. ते पण आपल्या जागे वर बसले ... पण मी जाणार आहे मी जाणार आहे लवकर.. क्लाइंट कडे जाणे आहे.. पैसाचा मामला असे काही तरी बडबडत बसले... ! प्रभु म्हणाले " बस रे. जाशील. हे सर्वसाक्षी पण परोल वर आले आहेत... "  सर्वसाक्षी " हो कुटूंब गेलं आहे हळदी कुंकु करायला.. तो पर्यंत पेरोलच आहे... बाकी आठ ला मी पण जाणार.."


रामदासबुवा तर खुप मितभाषी आहेत बॉ... आमच्या बडबड्या ग्रुप मध्ये.. निलकांत-विजुभाउ व हे गप्पचुप ! त्यांचा लेख आला होता चित्रलेखा मध्ये... व तो चित्रलेखा माझ्या बॅग मध्येच होता त्याचा आधार घेऊन मी त्यांचे अभिनंदन केले व लेख छान असल्याची माहीती... ! त्यावर ते पुन्हा हसून गप्प !   तोच किचन मधून बिस्किट आंबाडे घेऊन आले ... मला तर तो उडीद वड्याचा लहान भाऊ असावे असेच वाटत होते पण गोळे मस्त होते... हिरव्या मिर्चांची चटणी व बिस्किट आंबाडे जबरा.... ! एक.. दोन..तीन... असे अगणित पोटात सरकवल्यावर पोटाराम शांत झाला माझा.. !   काकुंची व आपल्या मुलाची अभिषेक ची ओळख करुन दिली प्रभुंनी.... आम्ही नमस्कार केला...  तात्याने दंडवत घातला... आम्हाला आपल्यात असले संस्कार का नष्ट झाले ह्याचा विचार करण्यास एक संधी मिळाली... मी पुढे होऊन नमस्कार घालावा हा विचार करत होतोच.. पण काकु किचन मध्ये.. काय तर सुर-सुर वाजले म्हणून आत गेल्या... व माझा संस्कार दाखवा कार्यक्रम तेथेच बंद पडला..


पुन्हा चर्चेची गाडी मी मिपावर नसल्याच्या मुद्द्यावर.....  रामदास " तुम्ही मिपावर दिसत नाही आजकाल " प्रभु " येडझवा आहे.." साक्षी " हो तुम्ही दिसत नाही"  तात्या " सोडून गेला आहे... "  मी  एकाद्या निर्लज गुन्हेगारासारखा हसत " नाही हो... येतो आहे.. येणार आहे... " म्हणत ... म्हणालो " तात्या, क्लास झाला आहे.. परवा दिल्ली पोहच्लो की लॉग इन होतो.. " ... विजुभाउ पण हसत म्हणाले " ह्म्म.. पाहू"   तात्या पण " पाहू"  असे म्हणुन पण तात्या मी निघतो, असे सांगून पार झाले !


पुन्हा फोन प्रभुचा.. " आला... येईल आता लगेच टार्या... त्याला घेऊन येतो मी... बसा.." अहो आम्ही पण येतो " साक्षी साहेब पण चला मी पण येतो असे म्हणून.. मागे मागे... त्याच्या मागे रामदास बुवा... त्यासर्वांच्या मागे निलकांत.... आता मोकळ्या हॉल मध्ये मी बसून काय करु.... व काही तरी पोटात गेल्यावर धुराडे काढणे जरुरि म्हणून मी पण त्याच्या मागे मागे... प्रभु सर ह्या वयात देखील  ;)  सर सर चार मजले उतरून खाली गेले... पाय-यांनी... ! मला स्वतःची लाज वाटू नये म्हणून मी-विजुभाउ-निलकांत... सर्वजण देखील त्याच्या पाठी मागे पाय-या उतरुन खाली गेलो... !


जवळच असलेल्या टपरी वरुन प्रत्येकांने आपापले सामान घेतले व चर्चा पुन्हा रंगू लागली... दोन एक धुराडे सोडून होऊ पर्यंत साक्षी साहेबांनी सुभाषचंद्र बोस ह्याच्या बद्दल तसेच काही अनाम क्रातिंवाराबद्द्ल उत्तम माहीती सांगितली !  पाच मिनिटात दर्शन देणारा टारझन साडे पंचवीस मिनिटे झाली तरी लापता होता..  पुन्हा गाडी माझ्या विषयावर आली... व माझा व्यवसाय पोटापाण्याचे हाल ह्यावर एक अत्यंत महत्वपुर्ण तथा गहन चर्चा झाली.. मुद्दे एकदम राष्ट्रीय स्थराचे म्हणजेच दिल्ली कडील होते म्हणून त्यावर आधी काही लिहीत नाही गुप्ततेचा भंग होतो... मध्येच रामदास बुवांनी शेयर मार्केट कधी वर जाइल असा प्रश्न करुन मला यार्कर टाकला... पण मी पाच्-सात वर्ष झाली मराठी महाजाल विश्वावर वावरत आहे त्यामुळे असले यार्कर अपेक्षीत होते पण रामदास बुवाच माझी मागून विकेट घेतील ही मनात जरा ही कुशंका नव्हती... पण विकेट पडलीच होती.. काय तरि सांगायचे म्हणून.. मागच्या आठवड्यात.. तासभर बसून तयार केलेल्या मार्केट रिपोर्ट मधीले एक पेटेंट वाक्य टाकले... होईल वर होइल.. पण सत्यम मुळे गोंधळ वाढला आहे... पाहू काय होतं ते" असे थातुर्-मातुर उचारून मी माझी लंगोटी संभाळली !  तोच पुन्हा मोबो वाजला प्रभुचा व तो आला.. घेऊन येतो असे म्हणन टांगा टाकत  (उंची मुळे चालत गेले हे वाक्य येथे चांगले दिसत नाही) गेले त्यावेळी मी पाहीले अरे हे तर बरमुड्यावर गेले... पॅन्ट घालायला विसरले की हा देखील समुउपदेशातील एक उपदेश.. लाजू नका. ! पण माझ्या मनातील प्रश्न मी तीथेच गिळला व पुन्हा चर्चेत सहभागी झालो... तो पर्यंत निलकांत व साक्षी ह्यांची गाडी लई पुढे गेली होती व मुद्दे काहीच कळत नव्हते... हे पाहून मी पुन्हा एक धुराडा सोडला व निचिंत पणे उभा राहीलो...


प्रभु ज्या वेगाने गेले होते त्याच वेगाने एकटेच परत आले.. टार्याला विसरलेली काय ? असा बाळबोध प्रश्न माझ्या मनात आला पण येवढ्या वयस्कर  ;)  मानसाला कसे विचारावे म्हणून गप्प बसलो... तोच मागून एक रिक्षा दिसली व दोनचार टन वजन भरले असावे ह्या प्रकारे हळू हळू.. पुढे येत होती... मी विचार करतच होतो... की वाहतूकीच्या साधनातून लोक आपले वजनी सामानाची का ने-आण करतात, मुंबई मध्ये काही कायदा आहे का नाही.. हा प्रश्न मी निलकांतला विचारावे म्हणून सारावलो होतो तोच.. त्याच रिक्षातून... एक सुकुमार... नवयुवक आपले एक ट्नी धुड सांभाळत बाहेर पडला... व रिक्षावाल्याला पैसे देऊन आमच्या कडे पाहून हसू लागला..  व प्रभु सरांच्या कडे आला...  ह्याला कुठे तरी पाहीला आहे हा विचार डोक्यात घण घालू लागला व सर्वाच्या खरडवह्या डोळ्यासमोरुन काढल्यावर टारझन म्हणजे हाच नमुना ह्यावर शिक्कामोर्तब केला.


" अरे हेच काय राज जैन, वाटत नाय यार..."  असा चार-पाच वेळा माझा उलेख त्याने केला व ह्याला उचलून चवथ्यामाळावरुन सरळ ग्राऊडला टाकावे ह्यासाठी माझे हात सळसळू लागले पण मी ६० किलो तो ६०० किलो कुठ पेलवणार ह्या व्यवसायीक हिशोबाने मी तो विचार रद्द करुन त्याच्या विनोदाला दाद दिली.   :D  थोड्या वेळाने टार्याची पण पोट पुजा झाली ( त्याच्या गळ्यातच चिकटले असेल... पोटापर्यंत पोहचलेच नसेल पण .. राहु दे)  पुन्हा एकदा अभिषेक ची ओळख परेड झाली व गाडी त्याच्या शिक्षणावर पोहचली... !  अभिषेक कडे पाहून व त्याचे शिक्षण पाहून आनंद झाला... त्याने कुठला तरी उच्च कोर्स लावला आहे व त्या कोर्स साठी फक्त १०० सिट साठी काही शे अर्ज होते त्या पण  हा पहिल्या पाच मध्येच निवडला गेला असे काहीतरी मला कळाले ( आम्ही दहावी पास... ते पण.. कसे दे देवालाच माहीत.. त्यामुळे त्याची डीटेल देऊ शकत नाही) 


वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही.. एक निलकांत सोडला तर बाकी सगळे मला नवीन होते व त्यांना मी नवीन पण जसे काही वर्षापासूनचे जुने सवंगडी बोलावेत वागावेत असे सगळे वागले... खुप आनंद झाला.... ! कधी मधी साक्षी साहेबांनी एकदोन फोटो क्लिकले ... ! व रामदास-साक्षी-प्रभु-विजुभाउ एका गुप्त मिटींग ला जाण्यासाठी व निलकांत-टार्या पुणे ला जाण्यासाठी व मी दिल्ली ला जाण्यासाठी बाहेर पडलो... !


प्रभु, निलकांत, विजुभाउ, साक्षी साहेब, तात्या व रामदास बुवा ह्या सर्वांनाच भेटून आनंद झाला ! असेच आपण नेहमी भेट राहू हा आशावाद घेऊन मी.. मिपावर पुन्हा लिहते झाल्यावर काय काय फाडायचे व काय काय शिवायचे ह्याचे प्लान करत आपल्या ट्रेन कडे रवाना झालो !


 


हुश्श !!!


 


समाप्त !


 


पण ह्यावेळचा माझा प्रवास माझ्या जन्मभर लक्ष्यात राहील मी एक-दोन नाही तर चांगले ९ मिपा करांना भेटलो... चार जनांशी फोनवर बोललो ! सगळेच फंडू आहेत... सगळे आपापले व्यवसाय-काम- धंदे संभाळत असे एक दुस-यांना भेटत असतात हे पाहू धन्य झालो.. ! याहू ग्रुप वर शेकडोंनी मित्र व जीमेल मध्ये काही हजार आयडी पण कोणाशी भेटावे.. कोणासाठी आपला कामधंदा सोडून जावे एवढी आत्मीयता मला कधीच झाली नाही पण मिपावर ती आत्मियता निर्माण झाली व अनेक वर्षापासून अमराठी मित्राच्या गराड्यात हरवलेला राज जैन... परत आपल्याच मातीच्या... भाषेच्या मित्रांच्या जगात आला... हे पाहून त्या देवाला देखील आनंद झाला असेल... !


 

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

are va, tumcha blog navta pahila raje.. sahi aahe!
ani gammat mhanje, mi hech template adhi nivadla hota! churagaLalelya kagadacha effect mastt ahe!